शिरूरमध्ये ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान श्रीमद् भागवत कथामृताचे आयोजन ; पं. डॉ. काशिनाथ मिश्रा यांचे कथानिरूपण
शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)
सध्याच्या कलियुगातील सामाजिक अस्थिरता, मानवी स्वभावातील चंचलता आणि वाढत चाललेली मूल्यघसरण यामुळे समाज मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. युगपरिवर्तनाच्या काळात बदल अटळ असून, भविष्यात मोठ्या संघर्षांचे संकेत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही भारत आपले वेगळे अस्तित्व राखत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दुःख, नैराश्य आणि सामाजिक अधःपतनातून मार्ग काढण्यासाठी भागवत प्रचाराची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत श्रीमद् भागवत कथामृताचे आयोजन करण्यात आले आहे. या कथासमारंभात पंडित डॉ. काशिनाथ मिश्रा हे भागवत कथेचे निरूपण करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पं. डॉ. काशिनाथ मिश्रा म्हणाले,
“भारत ही देवभूमी आहे. धर्म ही समाजाला योग्य दिशा देणारी मोठी शक्ती आहे. अनेक संकटांवर मात करूनही सनातन धर्म आजही टिकून आहे. आध्यात्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विश्व सनातन संस्थेच्या माध्यमातून भागवत कथा घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
भागवत कथेमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, माणसाला योग्य मार्गदर्शन मिळते आणि जीवनमूल्यांची जपणूक होते, असेही त्यांनी नमूद केले.
या श्रीमद् भागवत कथामृतासाठी शिरूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

