दारू पाजण्याच्या कारणावरून खून करणारा आरोपी १२ तासांत जेरबंद
शिरूर : सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगावरासाई) याचा खून करण्यात आला. अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी राहुल दत्ता गव्हांडे (वय २३, मुळ रा. धनज ता. उमरखेड जि. यवतमाळ, सध्या रा. वडगाव रासाई) याला शिरूर पोलिसांनी जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी केली.
शनिवारी (दि.१६ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास सृष्टी हॉटेल बिअरबार समोर, अंबिका पानटपरीजवळ ही घटना घडली. आरोपी राहुल गव्हांडे याने अविनाश याला हाताने मारहाण करून डोकं दगडावर आपटले. गंभीर दुखापतीमुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेवरून शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास उपनिरीक्षक हणमंत नकाते करत आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम चव्हाण, उपनिरीक्षक हणमंत नकाते, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, पोलिस हवालदार व कर्मचारी असे तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असतानाच पोलिस मित्र सागर उर्फ सोनू कोळपे याने दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपीचा ठावठिकाणा लागला. पाटील माळ, वडगाव रासाई येथे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
चौकशीत दारू पाजण्याच्या कारणावरून वाद होऊन खून केल्याची आरोपीने कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिप गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
